1.10.14

त्रस्त!


आज यवतमाळला होतो. इथे खूप डास आहेत. लाईन पण जाते. संध्याकाळी घरात डासांनी त्रस्त करू नये म्हणून पोराला घेऊन बाहेर निघालो. इथे घरापुढे अंगण आहे. वर गच्चीही आहे. त्याला गच्चीवर घेऊन गेलो. आता तो सहा महिन्यांच्या होत आला आहे. जन्मापासूनच भरपूर असलेले त्याचे केस आता चांगलेच लांब वाढलेत. अजून जावळे काढण्याचा कार्यक्रम व्हायचाय ना! संध्याकाळच्या हवेने त्याचे केस भुरूभुरू उडत होते. गच्चीवरून तो आजूबाजूला बघत होता ना... तेव्हा!

त्याला कडेवर घेऊन फिरवायला लागलो. पाचेक मिनिटांनी एक पक्ष्यांचा थवा उडत उडत आला. पश्चिमेकडून पूर्वेकडे.... सहज म्हणून त्याला दाखवलं! “ते बघ! चिऊ...” अजून पुरता सहा महिन्यांचा देखील नाही, त्याला कसलं काही कळणार? पण दाखवलं! पठ्ठ्याने पाहिलं देखील! तेही अगदी मन लावून! त्याला उडणारे पक्षी दिसले. आणि त्यानंतर आलेला प्रत्येक थवा त्याने तितक्याच उत्साहाने पाहिला. अगदी पूर्वेकडच्या आकाशात गडप होत नाही तोपर्यंत!

जरा अंधारून यायला लागलं तर खाली गेलो. गाईच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज आला. तो भिरभिर पहायला लागला “अरे बघ बघ! हम्बा!” त्याला जवळ नेऊन गाय दाखवली. मावळत्या दिवसाबरोबर घरी जाता जाता मैदानावर उगवलेल्या गवताने मुखशुद्धी करणाऱ्या गाई त्याने पाहिल्या. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येणे बंद होईपर्यंत तो त्यांचा वेध घेत होता. संध्याकाळी मैदानावर पळत पळत आलेली काही कुत्री त्याला दाखवली. “बघ आकु!” तो डोळे विस्फारून पहायला लागला. कुत्री जिकडे पळतील तिकडे त्याची नजर त्यांच्या हालचालींचा वेध घेत राहिली. एव्हाना अंधारून आलं. घरी परत निघालो. रस्त्यावरून जाणाऱ्या बाइक्स, कार्स, आणि ऑटोचे हेड-लाईट्स आता त्याला आकर्षित करू लागले. बाजूच्या जयस्वालकडची मंडळी त्यांच्या नव्या एसेंट मध्ये बसून जवळच्या त्यांच्या शेतावर निघाली होती. कार थांबवून त्यांनी बाळाला टा टा केला. खुशीत घरी परतलो. समोरच्या अंगणातल्या पाळण्यावर जाऊन बसलो. झोका घेतला तरी डास चवतच होते. “बाप रे! नागपूरला डास नाहीत हे बर आहे!,” सहज मनात विचार आला..

हो! नागपूरला डास नाहीत. पण नागपूरला अंगणही नाहीय. नागपूरला पक्षांचा थवा दिसत नाही. नागपूरला हम्बापण नाही. आकु पण नाही. असलेच तर पाप्पीस किंवा डॉगीस आहेत. नागपूरला गच्चीपण नाही. टेरेस आहे, पण त्यावर बाळाचे केस कधी हवेच्या झुल्यावर भुरभूर उडालेले पाहिले नाहीत.
तरीपण नागपूर नागपूर आहे. शहर आहे! किती सुविधा आहेत! मेट्रो सिटी! बाजुच्याकडे आहे तशी एसेंट तिथे शेकडो लोकांच्या जवळ आहे.

पण ती रस्त्यावर थांबवून बाळाला टा टा कुणी करत नाही.

एक लक्षात आलं. नागपूरला आहेत त्या गाड्या यवतमाळला आल्यात. तसे रस्तेही झालेत. पण लोक अजून तसेच आहेत. इथली चिऊ, हम्बा, आकु अजूनही जिवंत आहेत. इथल्या घरावरची गच्ची आणि संध्याकाळची हवा अजूनही शाबूत आहे. यंदा पाउस कमी झाला, तरी मैदानावर अजूनही गाय चरू शकेल इतकी हिरवळ आहे. घराचं अंगण हिरवं आहे, त्यातला पाळणा अजूनही झुलतोय.

मनात आलेलं हे सगळ मी इथे कम्प्युटर वर झटपट टाईप करू शकतोय. ब्लोग वर टाकायला इंटरनेट आहे. तरीही यवतमाळ छोटंसं गाव आहे. इथे क्वालिटी ऑफ लाईफ कमी आहे. म्हणून मी उद्या सकाळी नागपूरला परत जातोय. नोकरीवर जॉईन व्हायला.

12.7.14

गुरुज्ञान आणि गुरुकृपा


लेखनप्रपंचाचा पुनश्च हरीओंम करण्यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ताहून चांगला मुहूर्त तो कोणता? खरं पाहिलं तर ‘अवघा तो शकून, हृदयी देवाचे चिंतन’ असे जगदगुरू तुकोबाराय सांगून गेलेत. त्यामुळे मुहूर्त वगैरे पाहण्याची गरजही नाही.  पण नव्याने सुरुवात करण्यासाठी एखादा लक्षात राहण्यासारखा दिवस असणेही जरुरीचे. कदाचित या दिवसाच्या प्रेरणेने सुरु झालेले हे लेखन परत थांबणार नाही याची काळजी सद्गगुरूंनाच असावी म्हणून त्यांनी आजचा दिवस निवडला.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घडवण्या-या प्रत्येकाचे स्मरण होणे सहाजिक आहे. आई-वडील, आजी-आजोबा, पहिले शिक्षक, आणि नंतर ओघा ओघाने येणारे अनेक मार्गदर्शक, विविध क्षेत्रातले आपले आदर्श, आणि शेवटी समर्थ सदगुरू. वास्तविक पाहता माणूस आयुष्यभर प्रत्येक क्षणी काही ना काही शिकतच असतो. म्हणजे तो असतो विद्यार्थीच. या जीवनाच्या शाळेचा प्रत्येकजण विद्यार्थीच आहे, तर मग कुणी एक गुरु कसा काय होतो? केवळ आपल्या पेक्षा वय, अनुभव आणि माहिती जास्त असणारी व्यक्ती आपला गुरु होवू शकते का? की गुरु म्हणजे कुणीतरी चमत्कारी व्यक्ती, अलौकिक पुरुष, की प्रत्यक्ष देव? गुरु ही एक व्यक्ती नाही. ते तत्त्व आहे. कुणाला आपल्या गुरुपदी बसवण्यासाठी त्याचे वय, वर्तमान, शिक्षण, अनुभव या कसोट्या लावून चालत नाही. चमत्कार करण्याची क्षमता, मनातलं ओळखण्याची कला, बोलण्याची चलाखी ह्या गोष्टींचाही तिथे काहीच उपयोग नसतो. आपल्या मनाचे आणि समोरच्या व्यक्तीचे तार जुळायला हवेत. तरच ते साध्य होतं. मग केवळ ‘गण गण गणात बोते’ म्हणणारे गजानन महाराज मोठमोठ्या साहित्य आणि भाषा-प्रभूंचे गुरु होतात.

गुरु म्हणजे ज्ञान देणारा, की ज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवणारा? गुरु म्हणजे संकटातून वाचवणारा की त्यांचा सामना करण्याची शक्ती देणारा? केवळ आपल्याला येणा-या अडचणी दुर करणारा ट्रबल शुटर म्हणजे गुरु का? गुरु म्हणजे आपल्या मधील असलेल्या शक्तीचा आपल्याला परिचय करून देणारे तत्त्व आहे. गुरु पदावर बसणारी व्यक्ती गौण आहे. गुरु तत्त्वाशी आपली मानसिक जोडणी किती बळकट आहे, त्यावर सगळकाही अवलंबून आहे.

जर ज्ञान देणाराच गुरु असं मानलं, तर पितामह भीष्म, द्रोणाचार्य, आणि कर्ण या तिघांनाही भगवान परशुरामांनीच ज्ञान दिलं. या तिघांचीही पात्रता होती म्हणूनच परशुरामांनी त्यांना शिष्य म्हणून निवडलं. मात्र तिघांचीही नियती अगदी वेगळी होती. कर्णाने धनुर्विद्येचं ज्ञान प्राप्त केलं, हे नक्की, पण त्याला गुरुकृपा प्राप्त झाली नाही. म्हणजेच गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घेण एकदा सहज होईल, पण त्यांच्या कृपेसह हे ज्ञान प्राप्त करण हे अवघड आहे.

बलरामांना गुरु मानून गदायुद्ध शिकणारे त्यांचे दोन शिष्य एकाच तोडीचे आणि क्षमतेचे होते. मात्र विजय भीमाचा झाला. अगदी प्रत्यक्ष बलरामांचा पाठिंबा दुर्योधनाला असुन देखील! म्हणजेच ही गुरुकृपा मिळवून देणे हे केवळ गुरुच्या हाती देखील नाही. त्यासाठी शिष्याची पात्रता, सहजभाव, त्याचे धर्मसंगत, न्यायसंगत असणे, आणि योग्य मार्गावर चालणे हे महत्त्वाचे आहे.
म्हणूनच मग केवळ दगडा मातीच्या मूर्तीला गुरु मानून साधना करणारा एकलव्यदेखील गुरुकृपेचा धनी होतो. द्रोणाचार्य नावाच्या शिक्षकाने त्याच्याशी केलेल्या धोक्यानंतर सुद्धा तो श्रेष्ठ धनुर्धारी म्हणूनच गणला जातो, याचं कारण त्याच्यावर झालेली कृपा. ही कृपा द्रोण नावाचा व्यक्ती  खचितच करत नाही. ती एकलव्याच्या समर्पणातून त्याच्यावर होते. ती थेट गुरु तत्त्वाकडून.

आज आध्यात्मिक गुरु म्हणून प्रत्येकाने कुणाला न कुणाला मानण्याचा प्रघात आला आहे. कुणाला तरी गुरु मानून, त्याचे पाय धरून, त्याचे भजन पूजन आणि जप करून कदाचित त्या व्यक्तीकडून सहयोग, मार्गदर्शन आणि वेळ पडल्यास पाठिंबा प्राप्त होईल. आपली पात्रता मोठी असेल तर ज्ञान आणि सामर्थ्यदेखील मिळेल. मात्र गुरुकृपा मिळवण्यासाठी वेगळ्याच समर्पणाची, आचरणाची, आणि योग्य मार्गावर चालण्याची गरज जास्त आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुज्ञानाबरोबरच  गुरुकृपेसाठीदेखील पात्र ठरावे हीच सद्गुरुंना प्रार्थना.
ग्यान प्रकासा गुरु मिला, सों जिनि बीसरिं जाइ। 
जब गोविंद कृपा करी, तब गुर मिलिया आई॥

16.11.13

जा बावा जा! एकदाचा! आता डोक्याला ताप नाही राह्यला!


झालं! इतक्या दिवसांपासुन ज्याची चर्चा सुरू होती तो दिवस, तो क्षण आला एकदाचा! सगळ्यांना थॅक्यु म्हणून, डोळ्यातलं पाणी आवरत, आणि आपलं दैवी टेम्प्रामेन्ट कायम राखत तू भाषण ठोकलंस... आणि निघून गेलास! जा! आता डोक्याला ताप नाही राह्यला! --  किती काढले रे सचिनने? आहे का सचिन? गेला का सचिन? या बॉलवर बिट झाला का? त्या बॉलरमुळे चकला का? तीन चौके लगातार मारले आता सिंगल काढून घे!! नव्वदवर आहे आता हळू खेळ!! झाला का आउट? आता बंद कर टिव्ही! -- आता ही सगळी कटकट नाही राहिली सचिन!

अरे बा तू च नाही तर खेळात काही अर्थ  आहे का? क्रिकेट कधी पाहिलीच नाही सचिन, फक्त तुलाच पहात होतो! तू  आऊट झाला की टिव्ही बंद!! प्लेस्टेशनमध्यल्या क्रिकेटमध्येही तू आऊट झाला की गेम रिसेट! या क्रिकेटला तूझ्याशिवाय काही अर्थ  आहे का सचिन?

बाकी, तू पण खूप तडपवलंस सगळ्यांना! जेव्हा लोकं तुझ्या कानी कपाळी ओरडत होते -- की रिटायर्ड हो, रिटायर्ड हो, -- तेव्हा तू शांत बसायचास. काहीच न बोलता. देवा, खूप आवडायचं तूझं ते शांत बसणं. त्यात एक मॅसॅज असायचा! "थांबा! परत येतोय. काहीतरी नवीन चमत्कार दाखवायला!" आणि मनात विश्वास असायचाच! की काहीतरी होइल आणि चमत्कार दिसेल! तू आऊट झाल्यावरही वाटायचं सचिन, की परत बोलवतील तूला तर... चल सोड! आता हे सगळं कूठून आलंय वाटायला! आता डोक्याला तापच नाही! आता रिटायर्ड झाल्यावर हेच फंटोल म्हणतील की अजून दोन वर्ष खेळू शकला असतास तू! क्रिकेटचे एक्सपर्ट तर गल्लोगल्ली तयार करून ठेवले देवा तूच! तूझ्यामुळेच क्रिकेट पहायला लागले, समजायला लागले, आणि तूलाच शहाणपणा शिकवायला लागले! तूझं आपलं या सगळ्यांच्या वरच्या लेव्हलवर कुठेतरी एकदम वेगळंच चालू असायचं! आणि आपल्याला त्या लेव्हलवरचं काहीच कळण्याचा सवालच नाही, असं मानून तूझ्या नवीन चमत्काराची वाट बघत बसायचो आम्ही!

आता वाट पाहण्याचा प्रश्नच नाही. आता रेकोर्डींग पाहून जगणं आलं देवा. युटयूब आहे म्हणा आता. वाटेल तेव्हा वाटेल ती मॅच लावून पाहू शकतो... पण तो दैवी स्ट्रेट ड्राईव्ह, तो अप्पर कट, ते एकामागोमाग एक मारलेले चौके... आणि आऊट होते की काय, या भितीसह श्वास रोखून पाहिलेला तूझ्या खेळीचा एक एक मिनिट... हे काही आता येणार नाही. पून्हा तूझं ते रूप कदाचीत एखाद्या एक्झीबिशन मॅचमध्ये पहायला मिळेल! वर्ल्ड इलेव्हन व्हर्सेस ईंडिया ईलेव्हन वगैरे!

लोक म्हणतात की तू आता क्रिकेट एक्सपर्ट म्हणून टिव्हीवर येशील! ऍकॅडमी काढशील... पोरांना क्रिकेट शिकवशील... पण नको! नकोच येऊस तू कॉमेन्ट्री वगैरे करायला. शोभणार नाही देवा ते. आणि बघवणार सुद्धा नाही...!

18.7.13

नंदी


ईतकं डौलदार जनावर मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. 'महादेवाचा नंदी' म्हणुन अगदी चपखल शोभुन दिसेल असा तो बैल आमच्या घरापुढे येऊन उभा राहिला तेव्हा आश्वर्य, आनंद, उत्सुकता या सगळ्या भावनांनी मनात गर्दी केली. 'बुगुबुगु' वाजणं हे नक्की काय असतं हे ब-याच दिवसांनी कानांना ऐकायला मिळालं. नागपूरात कधी नंदिबैल येइल आणि तोही अगदी 'टिपीकल' पंढरपूर/कोल्हापूर कडच्या लोकांनी आणलेला असेल, असं स्वप्नातही वाटलं नाही. त्यांच्या खास पश्चीम महाराष्ट्रीय लेहज्यामध्ये खड्या आवाजात नंदिला प्रश्न विचारत त्या दोन तरूणांनी सुरवात केली. "पंढरपूरवरून आलायस का?", "नागपूरला राहशील का?", "रामटेकला जाणार का?" अगदी जुजबी प्रश्नांवर नंदिबैलाची मान 'होय होय' किंवा 'नाही नाही' मध्ये डोलायला लागली. एरवी स्मशानशांतता (ज्याला की हल्ली पिसफुल सोशल ऍटमॉस्फिअर म्हणतात) असलेल्या आमच्या सोसायटीमध्ये अचानक आवाज वाढलेला पाहून अनेकांच्या झोपा मोडल्या. काही लोक उत्सुकतेपोटी बाहेर आले. काही घराच्याच खिडक्या दारांमधून डोकावायला लागले. मात्र वाटलं होतं तसं काहीच झालं नाही.

गावात नंदि आला असता तर आजुबाजुची सगळी बच्चेकंपनी घराच्या बाहेर येऊन गोंधळ घालण्यात मग्न झाली असती. म्हातारी माणसं अंगणात, रस्त्यावर येऊन नंदिबैल आणि त्याच्या आजुबाजुला बागडणा-या नातवंडांचं कौतुक करत उभी असती. आई-बहिणींनी घरात पसा पसाभर गहू, दाळ नंदिबैलवाल्याला द्यायला आणण्यासाठी तयारी सुरू केली असती. आणखीही  खुप काही. मात्र ईथे त्याचं निटस असं स्वागतच झालं नाही. मरतुकड्यासारखे लोक आपल्या खोपट्यातून बाहेर यायलादेखील धजावत नव्हते.

नंदिबैलवाला मला आपल्या संस्कृतीचं, लोप पावत चाललेल्या परंपरांचं जतन करणारा पाईक वाटला. त्याला निदान दहा-वीस रुपये तरी द्यायचे असं ठरवून मी बाहेर निघालो. "हा पैसे खात नाही. गहू खातो. गव्हाचे पिठ खातो. तांदूळ, डाळ खातो..." नंदिवाल्याचे सुरू झाले. "काय रे पैसे खाशील का?"... बैलाने 'नाही नाही' अशी मान हलवली. "कागद खाशील?", "लाकुड खाशील?" या सर्व प्रश्नांवर त्याचे 'नाही नाही' सुरू राहिले. अचानक 'गहू खाशील?' विचारल्याबरोबर 'होय होय' अशी मान हलवून नंदिबैलाने अगदी एका क्षणात आपल्या बुद्धीमत्तेने ईम्प्रेस केले. एका वाट्यात तांदूळ आणि गुळाचा खडा घेऊन खाली आलो. "आपल्या हाताने खाऊ घाला. तो काहीच करत नाही," - नंदिबैलवाल्याने असं सांगीतल्यावरही हिम्मत झाली नाही. शेवटी त्याच्याच बरोबरच्या एका माणसाने आपल्या हाताने त्याला तांदूळ खाऊ घातले. नंदिबैलवाल्याने मग माझ्याबद्दल सांगायला सुरूवात केली. अर्थात ते महत्त्वाचं नाही. कारण ती त्यांची एक ट्रीक  असते. बाजुचा माणूस आपल्याला माहिती विचारतो. आणि ती कान देऊन  ऐकत दूसरा माणूस ती जाहीर करतो. "तुम्ही पत्रकार आहात! आत्ताच लग्न झाले आहे! सगळं छान होणार आहे!" ईत्यादी सांगत त्याने दोन चार भविष्याचेही फंडे दिले. पण माझ्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही.

अर्थ होता तो नंदिबैलाला घेऊन येणा-या नंदिवाल्यामध्ये. आम्हाला निदान अधूनमधून तरी दिसलेले हे आपल्या परंपरांचे पाईक कदाचीत यानंतरच्या पिढीला कधीच दिसणार नाहीत. ह्या परंपरा अजुनही जपणा-या या नंदिवाल्याला पैसे नको होते. खरोखरच नको होते. नागपूर ते रामटेकच्या वाटेवर जात असतांना बैलाचा सकाळचा नास्ता व्हावा म्हणुन त्याने नंदिबैलाच्या खेळाचा घाट घातला असावा. पण लोकांना हे मंजूर नव्हते. नंदिवाल्याने पंधराएक मिनिट गप्पा केल्या असतील तेवढ्यात बाजुच्या घरातून बाहेर आलेल्या एका माणसाने ओरडायला सुरूवात केली... "न्युसन्स होतोय. जोरजोरात ओरडून सकाळ खराब करता काय? निघा ईथून" आणि बरंच काही.

नंदिवाल्याला कदाचीत असल्या अपमानाची सवय नसावी. त्याच्या पंढरपूर/सोलापूर कडे त्याला बिदागी किती मिळत असेल माहिती नाही, पण अशी वागणुक मिळाली नसेल. नागपूरचे लोक घरातही बोलत नसतील ईतकी शुद्ध भाषा बोलत असणा-या त्याला नागपूरी लोकांची 'सो कॉल्ड' खासियत असलेल्या शिवराळ भाषेचीही सवय नसावी. नंदिवाल्याने आदरपुर्वक क्षमा मागुन तिथून काढता पाय घेतला. एका शब्दाचेही दुरूत्तर न करता तो निघून गेला. तडक निघून गेला. त्याला हाकलणा-या माणसाने गड जिंकल्याच्या तो-यात घरात एन्ट्री केली.

उद्या संस्कृती संकटात आली आहे, हल्ली कुणी आपल्या परंपरांना विचारत नाही, आणि युवा पिढीची वाट लागली आहे ईत्यादी विषयांवर हेच लोक पुढे होवून चर्चा करतील. युवा पिढीची छि थू करतील. परंतू सकाळी साडेआठ वाजता  ए सी मध्ये झोपलेल्या आपल्या दहा वर्षाच्या मुलाला उठवून 'हे बघ  आपल्या घरासमोर नंदीबैल आलाय' म्हणून या एका परंपरेशी त्याचा परिचय करून देण्याचं भान मात्र ठेवणार नाहीत. नंदिबैल परत येईल किंवा येणार देखील नाही, पण शहरी होण्याच्या मागे लागून आपला ठेवा मुद्दामहून हरवू पाहणा-या या नतद्रष्टांना काय म्हणावे? 

20.10.12

महिषासुरमर्दिनी दुर्गा


राक्षसांचा उन्माद वाढलेला, दुष्टशक्ती वरचढ झालेल्या आणि दैवी शक्तीची गळचेपी झालेली - अशा एकुण अवस्थेतुन मार्ग काढण्यासाठी सर्व देवदेवतांच्या एकत्रीतपणे केलेल्या प्रयत्नांतुन तयार झालेली एक महाशक्ती म्हणजे दुर्गा. देवीचं हे अष्टभुजा, सिंहवाहीनी, आणि शस्त्रास्त्रधारी रणरागिणीचं रूप म्हणजे शिवप्रिया पार्वतीने जगाच्या कल्याणासाठी घेतलेला भवानीचा अवतार असं आपण मानतो. पार्वतीनेच दुर्गा होउन महिषासुराचा वध केल्याचं आपण सगळ्यांनी वाचलेलं आहेच. मात्र केवळ एका रणचंडिने एकटीने कोट्यावधी राक्षसांवर केलेला हा हल्ला नव्हता. नसावा. हे होतं एक महायुद्ध.

रामायण-महाभारत या महाकाव्यांचा काळ अतीशय आधुनिक वाटावा  ईतक्या पुरातन ईतीहासात कधीतरी घडलेलं एक युद्ध. भगवान विष्णुंच्या दशावताराच्या कित्येक युगे आधी,  अगदी पुराणांच्या आणि वेदांच्याही आधी कधीतरी घडलेलं एक युद्ध. कदाचित मानव सभ्यतेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये झालेलं पहिलं निर्णायक महायुद्ध म्हणता येइल. या युद्धामध्ये असभ्य आसुरी शक्तीचा पराजय आणि सभ्य मानवी संस्कृतीचा विजय झाला. ईतर जनावरांपासुन मानव स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू शकला, ते या युद्धाच्याच परिणामस्वरूप. थोडा वैज्ञानीक (किंवा वैचारिक म्हणु) दृष्टीकोण लावून या महायुद्धाची भुमीका पाहिली तर दुर्गा अवतार म्हणजे किती प्रगत युद्धशास्त्राचं फलीत होतं हे आपल्या लक्षात येइल.

दुर्गासप्तशतीचा संदर्भ या ठीकाणी महत्त्वाचा ठरतो. सातशे श्लोकांचं हे पुस्तक म्हणजे देवीने केलेल्या महायुद्धाची युद्धगाथाच आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेक भक्त सप्तशतीचं पारायण करतात आणि देवीने मधु कैटभ, महिषासुर आणि शुंभ-निशुंभ या दैत्यांचा वध कसा केला, याची आळवणी करतात.

देवीने मारलेल्या राक्षसांपैकी 'मधुकैटभ', 'महिषासुर' आणि 'शुंभनिशुंभ' यांचा संबंध सरळ मानव सभ्यतेच्या उत्क्रांतीशी जोडता येतो. मधु आणि कैटभ यांचा जन्म सृष्टीनिर्मितीच्या अगदी सुरवातीच्या काळातला. योगनिद्रेत असलेल्या नारायणांच्या कानातून त्यांची उत्पत्ती झाली, आणि सृष्टी निर्माण करण्याच्या कामात मग्न असलेल्या ब्रम्हदेवाचाच वध करायला हे दोघे निघाले. अश्यावेळी आदिशक्तीच्या प्रेरणेने भगवान विष्णु निद्रेतून जागे झाले आणि मुष्टीयुद्ध करून या असुरांचा वध केला, अशी आख्यायीका आहे.

मानवी सभ्यता निर्माण होण्याचा, माणसाला आपल्या अस्तीत्त्वाचं भान येण्याचा, किंवा विचार करण्याची शक्ती येणं सुरू होण्याच्या अगदी सुरूवातीचा हा काळ असला पाहिजे. म्हणुनच मधु कैटभ हे सरळ समोर दिसणा-या ब्रम्हदेवाला मारायलाच निघतात, आणि  नंतर कुठल्याशी अस्त्रशस्त्रावीना, केवळ मुष्टीप्रहाराने त्यांचा निःपात होतो.

मधु कैटभ कुठल्यातरी योजने अंतर्गत ब्रम्हदेवाचा वध करायला निघालेले नाहीत. ते सरळ समोर दिसेल त्याला मारावे, या प्रवृत्तीने पुढे होत आहेत. ते शारिरिकदृष्ट्या अशक्त नाहीत, शक्तीशाली आहेत. मात्र केवळ मुष्टीप्रहारांनी ते मरतात, कारण त्यांच्यामध्ये शक्तीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नाही. म्हणजे त्यांच्याकडे विचारशक्ती नाही. उत्क्रांतीच्या टप्प्यादरम्यान जे काही मानवसदृशः पण विचारहीन प्राणी निर्माण झाले, त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी  अधिक उत्क्रांत मानवाने केलेला त्यांचा सफाया म्हणजे मधु-कैटभ वध म्हणता येइल. मानवी संस्कृतीच्या रक्षकाचं, पालनकर्त्याचं प्रतिक असलेल्या भनवान विष्णुंना मधु-कैटभ वध करण्याची मुष्टीयुद्धाची युक्ती सुचते, या मागची प्रेरणा म्हणुन सभ्य संस्कृती आदिशक्तीला वंदन करते. तीच्या प्रेरणेने ही शक्ती आली, असे म्हणुन मधु-कैटभाचा वध झाल्यावर तीच्या नामाचा जयघोष होतो.

महिषासुराचा काळ हा याची पुढची पायरी म्हणता येइल; जेव्हा की सभ्यतेचं भान आलेल्या मानव समाजाने जंगली अवस्थेत असलेल्या मानवसमुहाचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांचा काटा काढला. जंगली प्राण्यांसारखे आक्राळविक्राळ राक्षस, त्यांची अचाट शक्ती आणि त्यांचे भयाण दिसणे यांचे संदर्भ म्हणुनच या गाथेत वारंवार येतात. मग महिषासुर जंगली रेड्याचं रूप घेऊन अंगावर धावून आला, किंवा अमुक एक राक्षस गिधाडाचं रूप घेऊन आकाशमार्गाने चाल करून आला वगैरे संदर्भ वाचनात येतात. मुळात या सर्व प्राण्यांसह जंगली अवस्थेत राहण्या-या मानवांचा नाश करून (किंवा त्यांना संस्कृती शिकवून) सभ्यतेचं भान आलेल्या मानवाने केलेलं हे अग्नीदिव्य आहे. ईतर राक्षसांच्या मानाने जास्त शक्तीशाली आणि थोडा जास्त उत्क्रांत झालेला असल्याने महिषासुराचा वध करणं सामान्य योद्द्यांसाठी शक्य नव्हतं. त्याने आपली सेना बनवली, राज्य बनवले, आणि मग सुसंस्कृत झालेल्या मानव समुहाच्या 'स्वर्गा' वर हल्ले करणं सुरू केलं. हा उपद्रव असह्य झाल्यावर स्वसंरक्षणाचा विचार करण्याची शक्ती असलेल्या या समुहाने काहीतरी मोठा हल्ला (काउंटर अटॅक) करायचं ठरवलं. सर्वांची आराध्य म्हणजे आदिशक्ती. म्हणुन मग तिच्याच पहिल्या सगुण रूपाची - सतीची प्रतीमा त्यांच्यापुढे उभी झाली. सतीचाच पुनर्जन्म म्हणजे पार्वती, म्हणुन मग पार्वतीवर दुर्गावतार धारण करण्याची जबाबदारी आली.

एका सामान्य स्त्रीने धारण केलेला हा रणरागिणीचा अवतार. मुळात विचार करण्याची क्षमता कमी असलेल्या राक्षसांना लक्षातच येणार नाही ईतकी बेमालुमपणे, एखाद्या सरप्राईज कॉम्बॅट फोर्स सारखी या सेनेची उभारणी झाली. स्त्री कधी युद्ध करेल, ही कल्पनाच त्यांच्या ध्यानिमनी नसेल. यासाठी संस्कृतीच्या प्रत्येक शिलेदाराने, (आपण त्यांना देव म्हणु) आपापली युद्धनिती त्या सेनेला शिकवली. अगदी धनुष्यबाणापासुन ते शंख, चक्र, खड्ग, त्रीशुल, सर्व शस्त्रांमध्ये पारंगत अशी सेना तयार झाली. 'देवीचे गण' म्हणजे कठीणातल्या कठीण परिस्थीतीचा सामना करण्यास सक्षम असे योद्धे तयार झाले. देवीचं वाहन म्हणून वेगाने पुढे जाणारा एक रथ तेव्हा पुरेसा नव्हता. मग कुठल्याही परिस्थीतीत पुढे जाणारा, वेळ पडली तर हल्ला करू शकणारा, आणि केवळ एका गर्जनेने वनात राहणा-या असुरांचीही घाबरगुंडी उडवू शकणारा सिंह देवीचं वाहन झाला.

महिषासुरमर्दिनीच्या मदतीला युद्धात सामिल झालेल्या अनेक शक्तींचा परिचयही दुर्गासप्तशतीमध्ये आहे. ब्राम्ही, वैष्णवी, ऐंद्री, या प्रत्येक देवाच्या शक्ती या युद्धात सामिल झाल्या होत्या. म्हणजेच वर सांगीतल्याप्रमाणे ही एक सरप्राईज टास्क फोर्स होती, जी शत्रुला अवाक करून त्याला पराजीत करण्यासाठी तयार झाली होती.

आधुनिक युद्धनितीमध्येही सरप्राईज अटॅकला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. ओसामा-बिन-लादेन चा खातमाही अमेरिकेने सरप्राईज अटॅक करूनच केला होता. तसाच धक्का महिषासुराला देऊन त्याचा वध करण्यात देवीच्या सेनेला यश आलं आणि राक्षस म्हणजे असंस्कृती आणि असभ्यतेचा नाश झाला.

पुढे शुंभ-निशुंभ आणि रक्तबीज म्हणजे मानवी उत्क्रांतीतले अतीशय आधुनिक पाऊल म्हणावे लागेल. शुंभ निशुंभ हे ब-याच अंशी सभ्य संस्कृतीचे पालनकर्ते होते. मात्र स्वत्त्वाचं भान आल्यावर माणसात निर्माण झालेला अहं आणि सत्तेची, उपभोगाची लालसा यांनी त्यांना  असुर बनवले. रक्तबिजाची कथा तर खुपच प्रगत विज्ञानाकडे घेऊन जाणारी. त्याच्या वधासाठी पार्वतीला कालरात्रीचं रूप घ्यावं लागलं. कालरात्रीची कथा पुढे ओघाओघाने येइलच. तुर्तास महिषासुरमर्दिनीचा जयजयकार करून ईथे थांबु. 

18.10.12

पार्वती



ती पर्वतराज हिमालयाची कन्या. भगवान शंकरांची पत्नी. गणेश आणि कार्तिकेय या महापराक्रमी पुत्रांची माता, आणि ज्या दुर्गारूपाचं अधिष्ठान नवरात्राच्या नऊ दिवसांत तुम्ही आम्ही मांडतो, त्या दुर्गारूपाची मुळप्रकृती म्हणुन पार्वतीचा उल्लेख नवरूपांमध्ये महत्त्वाचा ठरतो. भगवान  शंकरांशी विवाह झाल्यामुळे पार्वती म्हणजे त्यांच्या आधिच्या पत्नीचा, म्हणजे सतीचा दुसरा जन्म  असल्याचं आपण परंपरेने मानतो.

मात्र हिमालय पर्वतांच्या रांगात वसलेल्या कुठल्याश्या एका नगराच्या प्रमुखाची एक साधारण मुलगी म्हणुन तीचा विचार करणे सुरू केल्यास पार्वतीने केलेल्या अग्नीदिव्यांचा खरा परिचय आपल्याला येइल.

कैलासाच्या अत्यंत दुर्गम शिखरावर वास्तव्याला असणा-या शिवाशी विवाह करायचा ध्यास तीने घेतलेला. या परिस्थीतीत राहणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. महिनोनमहिने बर्फाच्छादितच राहणा-या या प्रदेशात किती दिवस उपास पडतील याचा नेम नाही. म्हणुन तीने व्रत करून उपास-तापासाची सवय केली. उन-पाऊस-बर्फवृष्टी यांची पर्वा न करता ती अरण्यांमध्ये तप करत राहिली, ते यासाठीच.

शिवाशी विवाह झाल्यानंतर तीने पत्नी होण्याचा एक आदर्शच जगापुढे ठेवला. शिव-पार्वती संवाद, त्यांचे चौसर खेळणे, आकाशभ्रमणाला बरोबर जाणे, एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने रिझवीणे, त्यांचा शृंगार, त्यांचे रूसवे-फुगवे, त्यांचे हास्य-विनोद या सगळ्यांची पुराणं, महाकाव्य आणि महाशिल्प झाली. शिव आणि शक्ती यांनी मिळून सोळा विद्या आणि चौसष्ट कलांची पायाभरणी केली. आपल्या संस्कृतीच्या एकुण जडणघडणीमध्ये या जोडप्याचं महत्त्व ईतकं की अगदी नव-याला 'महादेव' म्हणेपर्यंत!

या जोडप्याचा महिमा ईतका की अगदी नव-याला 'महादेव' आणि बायकोला 'पार्वती' म्हणेपर्यंत! सामान्य लोकभाषेमध्ये ईतकं चपखल बसणं या जोडप्याला जमलं याचं कारण म्हणजे देवाधिदेव महादेवांची पत्नी झाली म्हणुन पार्वतीने आपलं सामान्यत्त्व त्यागलं नाही. उलट मुळातच असामान्य आणि अवलीया असणा-या शिवालाही तीनं सामान्य पतीसारखं रूसवे-फुगवे, प्रश्न-उत्तरे, प्रेम-शृंगार, हास्य-विनोद, वाद-विवाद, शर्यती ईत्यादिंमध्ये गुंतायला भाग पाडलं.

कार्तीकेय आणि गणेश या दोन पुत्रांवर तिनं केलेलं प्रेमही हीच गोष्ट अधिक स्पष्ट करतं. शिवाच्या त्रीशुळाने धडावेगळं झालेलं आपल्या लाडक्या पुत्राचं, गणेशाचं शिर हातात घेऊन टाहो फोडणारी पार्वती; मातापित्यांना ब्रम्हांड मानुन त्यांची प्रदक्षीणा करणा-या आपल्या या पुत्राला शर्यतीत विजयी ठरवणारी पार्वती; आणि  कार्तीकेयाच्या विरहात मनोमन अशृ ढाळणारी पार्वती; प्रत्येकवेळी पार्वतीने आपलं सामान्यत्त्व जपलंय. म्हणुनच लहानग्या गणपतीला  अंघोळ घालतांना, त्याचे लाडकोड करतांना माता पार्वतीच्या प्रतीमा प्रचलीत झाल्या. कोणत्याही आईला ते आपलं लेकरू वाटेल, आणि कोणत्याही लेकराला ती आपली माय वाटेल ईतकी सामान्यांशी जवळीक तीने जपली.

अश्या पार्वतीने जेव्हा शस्त्रे हाती घेऊन दुर्गेचं रूप धारण केलं, तेव्हा मात्र ते सगळं असामान्यच होतं! ज्याला पाहूनच भलेभले गर्भगळीत होतील अश्या विक्राल सिंहावर स्वार होणं, देवदेवतांना अगदी लिलया धूळ चारणा-या एकापेक्षा एक भयंकर राक्षसांच्या सैन्यात एकटीने घुसुन त्यांचा  निःपात करणं; आणि धडावेगळ्या केलेल्या शिरांची मुंडमाळ करून गळ्यात मिरवणं हे सगळं दैवी, असामान्य, अदभूतच म्हणावं लागेल. सामान्यत्त्वापासुन असामान्यत्त्वापर्यंत झालेला पार्वतीचा हा प्रवासच तीला पुर्णपणे आदिशक्तीचं रूप बनवतो. पार्वतीचा राजकन्या ते रणचंडी हा प्रवास म्हणजे एक सामान्य स्त्री काय काय करू शकते, किंबहूना तीने काय काय करावे याची गुरुकिल्ली आहे.

एक राजकन्या शिवप्राप्तीसाठी जीव धोक्यात घालून जर तपाची पराकाष्टा करू शकते, तर एक सामान्य मुलगी आपल्या लक्षप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा नाही का करू शकत? एक पर्वतकन्या एका सतत ध्यानमग्न अवस्थेत राहणा-या, तापट पण भोळ्याभाबड्या पतीला जर काव्यशास्त्रविनोदाचं वेड लावू शकते, तर कुणी सामान्य शहरी मुलगी आपल्या  नव-याला सिग्रेट सोडायला नाही का लावू शकत? आणि एरवी कोमलांगी गौरी असलेली शिवप्रिया जर दुर्गारूप धारण करून एकटीने हजारो राक्षसांना कापून काढू शकते, तर आजची सामान्य मुलगी तीची छेड काढणा-या एखाद्याला चपला-जोड्याने नाही का बडवू शकत?

पार्वतीने स्वतःतील आदिशक्तीला ओळखुन, तीचे आवाहन करून सामान्य जीवनातून  असामान्य जीवनाकडे वाटचाल केली. मात्र यातही आपला सामान्य पिंड तीने कायम जपला.  आदिशक्ती देवीचे पहिले सगुण साकार सौभाग्यवती रूप आणि म्हणुनच नऊ रूपांच्या मालिकेतील तीसरे रूप म्हणजे पार्वती.

17.10.12

सती



सती म्हटलं की पतीच्या चितेसह पत्नीने जिवंत जळण्याची अनिष्ट प्रथा आपल्यापैकी अनेकांना आठवेल. आता आपल्या समाजातून हद्दपार झालेली ही परंपरा नेमकी कुठून सुरू झाली असावी याचा शोध घेतल्यास दाक्षायणीच्या कथेचा संदर्भ येइल. दाक्षायणी म्हणजे विश्वेश्वर महादेवाची पहिली पत्नी. तिच्या पित्याकडे, प्रजापती दक्षाकडे असलेल्या महायज्ञाचं जावई असुनसुद्धा महादेवाला आमंत्रण नव्हतं. तरिसुद्धा आपल्या पित्याकडचा यज्ञ म्हणुन ती तिथं गेली. यज्ञस्थळी सर्व उपस्थीतांसमोर महादेवाचा झालेला अपमान असह्य झाल्याने तीने त्याच यज्ञकुंडात आत्माहूती दिली. शिवनिंदा श्रवण करण्यालाही महापाप मानुन दाक्षायणीने स्वतःच स्वतःसाठी घेतलेलं हे प्रायश्चीत्त होतं. यात तीने जी आत्माहूती दिली त्यानंतर तीला सती हे नामाभिधान मिळालं असावं. आपल्या पतीच्या सन्मानासाठी जीव देणे ही त्याच्याप्रती असलेल्या भक्ती वा प्रेमाची सर्वोच्च सिमा आहे असं मानुन त्या काळात सती हे नाव देऊन दाक्षायणीचा गौरव करण्यात आला असावा. सन्मानासाठी जीव देणे ही गोष्ट आपल्या संस्कृतीत नेहमीच गौरविली गेली आहे. मोगल आक्रमणांच्या काळात हजारो राजपुत स्त्रीयांनी सन्मानासाठी केलेले 'जोहर' आजही अभिमानानेच उल्लेखले जातात. त्याचप्रमाणे दाक्षायणीचा सती हा उल्लेख तीच्याप्रती, तीने केलेल्या कृत्याप्रती आदर म्हणुनच केला गेला असेल.

मात्र कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून ती अत्यंत विकोपाला नेऊन ठेवणे हेच आपल्या समाजाचं दुदैव आहे. म्हणुनच पुढे या कथेचा विपर्यास होउन पतिनिधनानंतर त्याच्या शवासह स्वतःला जाळून घेण्याच्या प्रथेला सती हेच नाव मिळालं आणि 'सती जाणे' ही पद्धत सुरू झाली. नंतर जबरीने बायकांना सती जाण्यास लावण्याची अमानुष पद्धतही सुरू झाली, आणि सती म्हणजे  आत्मभान विसरून पतीच्या शवाबरोबर स्वतःला संपवणारी स्त्री अशीच धारणा तयार झाली. आत्मभान नसणा-या काही अवलीया स्त्रीयांनाही मग 'सतीमाय' म्हणवले जाऊ लागले. थोडक्यात काय, स्वतःला विसरून गेलेल्यांचं नाव सती झालं आणि मुळ संकल्पनेचा पार बट्ट्याबोळ झाला.

आता दाक्षायणीच्या कथेचा पुढचा भाग पाहू. सतीच्या आत्माहूतीनंतर शिवकोपाचा जो उद्रेक झाला तो आपणा सर्वांना माहितीच आहे. सतीचं पेटतं शव घेऊन शोकमग्न फिरणा-या शिवाला शांत होण्यासाठी  कित्येक वर्ष लागली असं म्हणतात. तिच्या पेटत्या शवाचे तुकडे जे पृथ्वीवर पडले त्यातून भारत देशभर शक्तीपिठांची निर्मीती झाली, असंही मानतात.

आपल्या देशात असलेल्या शक्तीपिठांच्या आकड्याबाबत संभ्रम आहे. ती चार आदिशक्तीपिठं, अठरा महाशक्तीपिठं, की एकावन्न शक्तीपिठं आहेत, की एकुण चौसष्ट मंदिरं आहेत, हे अजुनही नेमकं सांगता येत नाही. याल वेगवेगळे संदर्भ आहेत. मात्र कुठल्याही शक्तीपिठाची मुळधारणा ही दाक्षायणीची कथा आहे, हे मात्र नक्की. यापैकी जवळपास प्रत्येकच मंदिरांस स्वतःची अशी उत्पत्तीकथा आहे. तरीसुद्धा सतीच्या कथेचा संदर्भ देऊन करून दिलेली या शक्तीपिठाची ओळखच महत्त्वाची ठरते. म्हणुनच शक्तीपिठ म्हटलं की या ठीकाणी सतीच्या शरीराचा कोणता अवयव पडला होता? हा प्रश्न भक्तांना आधी पडतो.

मग माहूरमध्ये सतीचा उजवा हात पडल्यामुळे ते मुळपिठ ठरतं, कोल्हापुरमध्ये डोळे पडल्यामुळे ते जागृत दैवत होतं तर वैष्णोदेवीमध्ये देवीचं शिर पडल्यामुळे तीथे 'साचा दरबार' भरतो. देवीच्या अनेक रूपांच्या निर्मितीची मुळकथा ही दाक्षायणीची, सतीची कथा ठरते. म्हणुनच देवीच्या ईतर रूपांची आदिकारीका म्हणुन 'सती' हे आदिशक्तीचं पहिलं सगुण रूप आणि नऊ रूपांपैकी दुसरं नाव ठरतं.