राक्षसांचा उन्माद वाढलेला, दुष्टशक्ती वरचढ
झालेल्या आणि दैवी शक्तीची गळचेपी झालेली - अशा एकुण अवस्थेतुन मार्ग काढण्यासाठी
सर्व देवदेवतांच्या एकत्रीतपणे केलेल्या प्रयत्नांतुन तयार झालेली एक महाशक्ती
म्हणजे दुर्गा. देवीचं हे अष्टभुजा, सिंहवाहीनी, आणि शस्त्रास्त्रधारी रणरागिणीचं रूप
म्हणजे शिवप्रिया पार्वतीने जगाच्या कल्याणासाठी घेतलेला भवानीचा अवतार असं आपण
मानतो. पार्वतीनेच दुर्गा होउन महिषासुराचा वध केल्याचं आपण सगळ्यांनी वाचलेलं
आहेच. मात्र केवळ एका रणचंडिने एकटीने कोट्यावधी राक्षसांवर केलेला हा हल्ला
नव्हता. नसावा. हे होतं एक महायुद्ध.
रामायण-महाभारत या महाकाव्यांचा काळ अतीशय आधुनिक वाटावा ईतक्या पुरातन ईतीहासात कधीतरी घडलेलं एक
युद्ध. भगवान विष्णुंच्या दशावताराच्या कित्येक युगे आधी, अगदी पुराणांच्या आणि वेदांच्याही आधी कधीतरी घडलेलं एक युद्ध. कदाचित मानव
सभ्यतेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये झालेलं पहिलं निर्णायक महायुद्ध म्हणता
येइल. या युद्धामध्ये असभ्य आसुरी शक्तीचा पराजय आणि सभ्य मानवी संस्कृतीचा विजय
झाला. ईतर जनावरांपासुन मानव स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू शकला, ते या युद्धाच्याच परिणामस्वरूप. थोडा वैज्ञानीक (किंवा वैचारिक म्हणु)
दृष्टीकोण लावून या महायुद्धाची भुमीका पाहिली तर दुर्गा अवतार म्हणजे किती प्रगत
युद्धशास्त्राचं फलीत होतं हे आपल्या लक्षात येइल.
दुर्गासप्तशतीचा संदर्भ या ठीकाणी महत्त्वाचा ठरतो. सातशे श्लोकांचं हे पुस्तक
म्हणजे देवीने केलेल्या महायुद्धाची युद्धगाथाच आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेक
भक्त सप्तशतीचं पारायण करतात आणि देवीने मधु कैटभ, महिषासुर आणि शुंभ-निशुंभ या दैत्यांचा वध कसा केला, याची आळवणी करतात.
देवीने मारलेल्या राक्षसांपैकी 'मधुकैटभ', 'महिषासुर' आणि 'शुंभनिशुंभ' यांचा संबंध सरळ मानव सभ्यतेच्या उत्क्रांतीशी जोडता येतो. मधु आणि कैटभ यांचा
जन्म सृष्टीनिर्मितीच्या अगदी सुरवातीच्या काळातला. योगनिद्रेत असलेल्या नारायणांच्या
कानातून त्यांची उत्पत्ती झाली, आणि सृष्टी निर्माण
करण्याच्या कामात मग्न असलेल्या ब्रम्हदेवाचाच वध करायला हे दोघे निघाले.
अश्यावेळी आदिशक्तीच्या प्रेरणेने भगवान विष्णु निद्रेतून जागे झाले आणि
मुष्टीयुद्ध करून या असुरांचा वध केला, अशी आख्यायीका आहे.
मानवी सभ्यता निर्माण होण्याचा, माणसाला आपल्या अस्तीत्त्वाचं भान येण्याचा, किंवा विचार करण्याची शक्ती येणं सुरू होण्याच्या अगदी सुरूवातीचा हा काळ असला
पाहिजे. म्हणुनच मधु कैटभ हे सरळ समोर दिसणा-या ब्रम्हदेवाला मारायलाच निघतात, आणि नंतर कुठल्याशी अस्त्रशस्त्रावीना, केवळ मुष्टीप्रहाराने त्यांचा निःपात होतो.
मधु कैटभ कुठल्यातरी योजने अंतर्गत ब्रम्हदेवाचा वध करायला निघालेले नाहीत. ते
सरळ समोर दिसेल त्याला मारावे, या प्रवृत्तीने पुढे
होत आहेत. ते शारिरिकदृष्ट्या अशक्त नाहीत, शक्तीशाली आहेत. मात्र केवळ मुष्टीप्रहारांनी ते मरतात, कारण त्यांच्यामध्ये शक्तीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नाही. म्हणजे
त्यांच्याकडे विचारशक्ती नाही. उत्क्रांतीच्या टप्प्यादरम्यान जे काही मानवसदृशः
पण विचारहीन प्राणी निर्माण झाले, त्यांचा उपद्रव
टाळण्यासाठी अधिक उत्क्रांत मानवाने
केलेला त्यांचा सफाया म्हणजे मधु-कैटभ वध म्हणता येइल. मानवी संस्कृतीच्या
रक्षकाचं, पालनकर्त्याचं प्रतिक
असलेल्या भनवान विष्णुंना मधु-कैटभ वध करण्याची मुष्टीयुद्धाची युक्ती सुचते, या मागची प्रेरणा म्हणुन सभ्य संस्कृती आदिशक्तीला वंदन करते. तीच्या
प्रेरणेने ही शक्ती आली, असे म्हणुन
मधु-कैटभाचा वध झाल्यावर तीच्या नामाचा जयघोष होतो.
महिषासुराचा काळ हा याची पुढची पायरी म्हणता येइल; जेव्हा की सभ्यतेचं भान आलेल्या मानव समाजाने जंगली अवस्थेत असलेल्या
मानवसमुहाचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांचा काटा काढला. जंगली प्राण्यांसारखे आक्राळविक्राळ
राक्षस, त्यांची अचाट शक्ती आणि त्यांचे भयाण
दिसणे यांचे संदर्भ म्हणुनच या गाथेत वारंवार येतात. मग महिषासुर जंगली रेड्याचं
रूप घेऊन अंगावर धावून आला, किंवा अमुक एक राक्षस
गिधाडाचं रूप घेऊन आकाशमार्गाने चाल करून आला वगैरे संदर्भ वाचनात येतात. मुळात या
सर्व प्राण्यांसह जंगली अवस्थेत राहण्या-या मानवांचा नाश करून (किंवा त्यांना
संस्कृती शिकवून) सभ्यतेचं भान आलेल्या मानवाने केलेलं हे अग्नीदिव्य आहे. ईतर
राक्षसांच्या मानाने जास्त शक्तीशाली आणि थोडा जास्त उत्क्रांत झालेला असल्याने
महिषासुराचा वध करणं सामान्य योद्द्यांसाठी शक्य नव्हतं. त्याने आपली सेना बनवली, राज्य बनवले, आणि मग सुसंस्कृत
झालेल्या मानव समुहाच्या 'स्वर्गा' वर हल्ले करणं सुरू केलं. हा उपद्रव असह्य झाल्यावर स्वसंरक्षणाचा विचार
करण्याची शक्ती असलेल्या या समुहाने काहीतरी मोठा हल्ला (काउंटर अटॅक) करायचं
ठरवलं. सर्वांची आराध्य म्हणजे आदिशक्ती. म्हणुन मग तिच्याच पहिल्या सगुण रूपाची -
सतीची प्रतीमा त्यांच्यापुढे उभी झाली. सतीचाच पुनर्जन्म म्हणजे पार्वती, म्हणुन मग पार्वतीवर दुर्गावतार धारण करण्याची जबाबदारी आली.
एका सामान्य स्त्रीने धारण केलेला हा रणरागिणीचा अवतार. मुळात विचार करण्याची
क्षमता कमी असलेल्या राक्षसांना लक्षातच येणार नाही ईतकी बेमालुमपणे, एखाद्या सरप्राईज कॉम्बॅट फोर्स सारखी या सेनेची उभारणी झाली. स्त्री कधी
युद्ध करेल, ही कल्पनाच त्यांच्या ध्यानिमनी नसेल.
यासाठी संस्कृतीच्या प्रत्येक शिलेदाराने, (आपण त्यांना देव म्हणु) आपापली युद्धनिती त्या सेनेला शिकवली. अगदी
धनुष्यबाणापासुन ते शंख, चक्र, खड्ग, त्रीशुल, सर्व शस्त्रांमध्ये पारंगत अशी सेना तयार झाली. 'देवीचे गण' म्हणजे कठीणातल्या कठीण परिस्थीतीचा
सामना करण्यास सक्षम असे योद्धे तयार झाले. देवीचं वाहन म्हणून वेगाने पुढे जाणारा
एक रथ तेव्हा पुरेसा नव्हता. मग कुठल्याही परिस्थीतीत पुढे जाणारा, वेळ पडली तर हल्ला करू शकणारा, आणि केवळ एका गर्जनेने वनात राहणा-या असुरांचीही घाबरगुंडी उडवू शकणारा सिंह
देवीचं वाहन झाला.
महिषासुरमर्दिनीच्या मदतीला युद्धात सामिल झालेल्या अनेक शक्तींचा परिचयही
दुर्गासप्तशतीमध्ये आहे. ब्राम्ही, वैष्णवी, ऐंद्री, या प्रत्येक देवाच्या शक्ती या युद्धात सामिल झाल्या होत्या. म्हणजेच वर
सांगीतल्याप्रमाणे ही एक सरप्राईज टास्क फोर्स होती, जी शत्रुला अवाक करून त्याला पराजीत करण्यासाठी तयार झाली होती.
आधुनिक युद्धनितीमध्येही सरप्राईज अटॅकला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच.
ओसामा-बिन-लादेन चा खातमाही अमेरिकेने सरप्राईज अटॅक करूनच केला होता. तसाच धक्का
महिषासुराला देऊन त्याचा वध करण्यात देवीच्या सेनेला यश आलं आणि राक्षस म्हणजे
असंस्कृती आणि असभ्यतेचा नाश झाला.
पुढे शुंभ-निशुंभ आणि रक्तबीज म्हणजे मानवी उत्क्रांतीतले अतीशय आधुनिक पाऊल
म्हणावे लागेल. शुंभ निशुंभ हे ब-याच अंशी सभ्य संस्कृतीचे पालनकर्ते होते. मात्र
स्वत्त्वाचं भान आल्यावर माणसात निर्माण झालेला अहं आणि सत्तेची, उपभोगाची लालसा यांनी त्यांना असुर
बनवले. रक्तबिजाची कथा तर खुपच प्रगत विज्ञानाकडे घेऊन जाणारी. त्याच्या वधासाठी
पार्वतीला कालरात्रीचं रूप घ्यावं लागलं. कालरात्रीची कथा पुढे ओघाओघाने येइलच.
तुर्तास महिषासुरमर्दिनीचा जयजयकार करून ईथे थांबु.